| |
< back |
|
दिग्दर्शनाचे पहिले धडे खरेंनी नंदकुमार रावते
यांच्याकडून घेतले. त्यांनी काही एकांकिका दिग्दर्शित केल्या तसंच
व्यावसायिक रंगभूमीसाठीही काही नाटकं दिग्दर्शित केली.
१९७२ साली मुंबईत दूरदर्शन सुरु झालं आणि कलाकारांसाठी एक दालन
उघडलं गेलं. चित्रपट दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांनी दूरदर्शन निर्माते
विनायक चासकर यांच्याशी खरेंचा परिचय करुन दिला. "जानकी"
या चित्रपटाचं 'चित्रावलोकन' हा चर्चात्मक समीक्षेचा कार्यक्रम
हा खरेंचा दूरदर्शनवरील पहिला कार्यक्रम. 'गजरा' आणि 'नाट्यावलोकन'
हे खरे यांचे दूरदर्शनवरील कार्यक्रम अतिशय गाजले आणि लोकप्रिय
झाले. सूत्रसंचालक म्हणून खरे यांनी आपल्या खास शैलीचा ठसा या
कार्यक्रमांवर उमटवला.
|
|
|
|
रंगमंचावरती कलवंतांची 'लाइव्ह' मुलाखत घेणं याचं एक वेगळ तंत्र
आहे. खरे यांचं कौशल्य यातही दिसून आलं. अभ्यासपूर्ण आणि खोचक
प्रश्न आणि मधून मधून नर्मविनोद यामुळे या मुलाखती अतिशय रंजक
होत.
आपलं नाटक रंगभूमीवर येण्याआधीच खरेंनी चित्रपट क्षेत्रात लेखक
म्हणून प्रवेश केला होता. आकाशवाणीवरील श्रुतिकांमुळे त्यांच्या
चटपटीत आणि समर्थ संवादांचा परिचय झालाच होता. 'धनंजय' या चित्रपटाचे
संवाद खरे यांचे होते. चित्रपट क्षेत्रात 'करीअर' त्यांना करायचे
नव्हते. काही चित्रपटांच्या कथा, पटकथा, संवाद त्यांच्या नावावर
आहेत. परंतु यात त्यांनी फारसा रस घेतला नाही.
|
|
|
|
१९८१ मध्ये नोकरी सोडल्यावर खरे यांनी व्हिडिओ फिल्मच्या निर्मिती
क्षेत्रात उतरायचं ठरवलं. या माध्यमातला अनुभव आणि ज्ञान यांच्या
बळावर त्यांनी काही महत्वाच्या लघुपटांची निर्मिती केली. लेखन,
दिग्दर्शन संकलन या महत्वाच्या तांत्रिक बाजू स्वतः हाताळून अत्यंत
दर्जेदार अशा लघुपटांची निर्मिती त्यांनी केली.
रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन या तिन्ही क्षेत्रातला प्रत्यक्ष
अनुभव गाठीशी असल्यामुळे त्यांनी या क्षेत्राशी संबंधित अशा विषयांवर
कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सूत्रसंचालानाच्या
कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद सतत मिळतो.
चाळीस वर्षाचा रंगभूमीवरील अनुभवाचा फ़ायदा इतरांना देण्यासाठी
या संबंधात अनेक विषयांवर त्यांची व्याख्यानं होत असतात.
|
|
|
पंचवीस वर्ष लेखनावर सारं लक्ष केंद्रित केल्यानंतर खरे यांच्यातल्या
'नटानं' पुन्हा उचल खाल्ली. त्याचा परिणाम म्हणून 'मिश्किली' या
प्रयोगाची निर्मिती झाली. लेखन, दिग्दर्शन, अभिनय या तिन्ही आघाड्या
सांभाळून आणखी तीन कलाकारांना मदतीला घेऊन त्यांनी या कार्यक्रमाचे
अनेक प्रयोग केले. त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. एकट्या अमेरिकेत
पंचवीस वेगवेगळ्या शहरांत मिश्किलीचे प्रयोग झाले. असे नवीन कार्यक्रम
ते सातत्यानं करीत असतात. संगीत प्रेमी असल्यामुळे नवनवीन संकल्पनांचे
अनेक संगीत कार्यक्रम त्यांनी निर्मिती करुन सादर केले.
|
|
|
|
सुरेश खरे यांनी रंगभूमीसाठी केलेल्या योगदानाची अणि त्यांच्या
कर्तृत्वाची सर्व स्तरांवर दखल घेतली गेली. अनेक मानसन्मान त्यांच्या
वाट्याला आले.
८५ च्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची
झालेली निवड हा त्यातला सर्वोच्च सन्मान होता. |
|
|
< back |
|